*तेलकुडगाव येथील घाडगे पाटील विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त मातृ-पितृ पूजन व पालक मेळावा उत्साहात संपन्न*

*तेलकुडगाव येथील घाडगे पाटील विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त मातृ-पितृ पूजन व पालक मेळावा उत्साहात संपन्न*
नेवासा (प्रतिनिधी) : मंगेश निकम
नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील कै. संत हरिभाऊ आनंदराव घाडगे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत आयोजित करण्यात आलेला ‘गुरुपौर्णिमा सोहळा, मातृ-पितृ पूजन आणि पालक मेळावा’ अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये गुरु, माता-पिता आणि संस्कारांविषयी आदरभाव जागविण्याचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात “गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः…” या गुरुस्तवनाने तसेच माता सरस्वती व गुरुवर्य बाबास्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि ध्यान-धारणेने झाली. त्यानंतर विद्यालयाच्या पब्लिक स्कूलमधील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आकर्षक नृत्याविष्काराने उपस्थित पालकांची मने जिंकली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या उपक्रमशील शिक्षिका वैशाली उभेदळ या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. सचिन घोडेचोर, सरपंच सतीश काळे, संभाजी घोडेचोर, श्रीकांत घाडगे, दीपक दिपकने, सोपान घोडेचोर, नवनाथ काळे, ज्योती काळे, सुधाकर माने, विजय गायकवाड, देविदास गायकवाड, संतोष पुरी, सोनाली काळे, जगन्नाथ सरोदे, संदीप काळे, अप्पासाहेब काळे, दादा म्हस्के, मल्हारी परभणे, भाऊसाहेब घोडेचोर, चांगदेव टकले, प्राचार्य भाऊसाहेब दुधाडे आणि प्रशासक मनीषा राऊत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित मातृ-पितृ पूजन हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरला. विद्यार्थ्यांनी स्वतः आणलेल्या पूजेच्या साहित्याने आपल्या माता-पित्यांचे विधिवत पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. या भावस्पर्शी क्षणांनी अनेक पालक आणि विद्यार्थी भावूक झाले. विद्यार्थ्यांच्या मनात पालकांविषयी कृतज्ञता, गुरुजनांविषयी आदर आणि जीवनमूल्यांविषयी जागरूकता निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी ॲड. सचिन घोडेचोर, सरपंच सतीश काळे आणि प्रशासक मनीषा राऊत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “गुरुंचे मार्गदर्शन आणि पालकांचे संस्कार हीच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची खरी शिदोरी आहे,” असे प्रतिपादन केले.
या प्रेरणादायी सोहळ्यास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद कराड यांनी केले, तर सूत्रसंचालन रेणुका काळे आणि जयश्री भांगे यांनी केले. शेवटी विद्यालय प्रशासनाने कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, पालक व उपस्थितांचे आभार मानले.
गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर विद्यार्थ्यांच्या मनात संस्कार, कृतज्ञता आणि भारतीय संस्कृतीची मूल्ये रुजविणारा हा सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.




