*दिल्लीत रेल्वेमंत्र्यांकडे आमदार विठ्ठलराव लंघे यांची जोरदार पाठपुरावा*
बेलापूर–परळी रेल्वेमार्गाला गती, तर राहुरी–शनि शिंगणापूर रेल्वेसाठी भूसंपादनाला शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेण्याची मागणी*

*दिल्लीत रेल्वेमंत्र्यांकडे आमदार विठ्ठलराव लंघे यांची जोरदार पाठपुरावा*
बेलापूर–परळी रेल्वेमार्गाला गती, तर राहुरी–शनि शिंगणापूर रेल्वेसाठी भूसंपादनाला शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेण्याची मागणी*
नेवासा | प्रतिनिधी –
अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासाशी निगडित दोन महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांबाबत आमदार विठ्ठलराव लंघे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि आमदार अमोल खताळ हेही उपस्थित होते.
या बैठकीत बेलापूर–नेवासा–शेवगाव–परळी प्रस्तावित रेल्वेमार्गाला तातडीने गती देण्याची मागणी करण्यात आली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पासाठी बेलापूर–परळी रेल्वे कृती समितीसोबत संयुक्त बैठक आयोजित करून सर्वेक्षण, तांत्रिक प्रक्रिया आणि पुढील प्रशासकीय कार्यवाहीला वेग देत प्रकल्प मार्गी लावावा, अशी आग्रही भूमिका आमदार लंघे यांनी मांडली.
तसेच राहुरी–श्रीक्षेत्र शनि शिंगणापूर प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या भावना व हरकतींचा गांभीर्याने विचार करण्याची मागणीही त्यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली. राहुरी तालुक्यातील देसवंडी, तमनर आखाडा, कोंढवड, उंबरे, ब्राम्हणी तसेच नेवासा तालुक्यातील वंजारवाडी, बेल्हेकरवाडी, कांगोणी आणि सोनई या गावांतील सुपीक, बागायती जमिनी संपादित होणार असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी विस्थापित होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. त्यामुळे सध्या सुरू असलेली भूसंपादन प्रक्रिया रद्द करून शेतकरी प्रतिनिधी, राज्य शासन आणि रेल्वे मंत्रालय यांची संयुक्त बैठक घेऊन सर्वमान्य व न्याय्य तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी आमदार लंघे यांनी विकासकामांना गती देणे आवश्यक असले, तरी शेतकरी, नागरिक आणि स्थानिक हितसंबंध यांचा समतोल राखूनच निर्णय घेतला जावा, अशी भूमिका स्पष्ट केली. या दोन्ही रेल्वे प्रकल्पांबाबत केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.




