कांद्याच्या भावाचा वांदा झाल्याने शेतकरी चिंताक्रांत!

कांद्याच्या भावाचा वांदा झाल्याने शेतकरी चिंताक्रांत!
नेवासे (प्रतिनिधी) – दिवसेंदिवस कांद्याचे प्रति क्विंटलचे दर कोसळत चालल्यामूळे कांदा उत्पादक शेतकऱ्यामध्ये सध्या प्रचंड असंतोष पसरला आहे त्यामुळे कांद्याला मिळणाऱ्या अत्यंत कमी दरामुळे शेतकरी मात्र चांगलाच हवालदिल झाल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांचे अर्थकारण या कांदा पिकांवर अवलंबून राहत असतांना मात्र अशातच कांदा पिकाला गेल्या काही महिन्यांपासून अत्यल्प भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झालेला आहे कांद्याचे प्रति क्विंटलचे दर आता कोसळत चालल्यामूळे नगर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे.
कांद्याला मिळणाऱ्या या कमी भावामुळे आता शेतकरी संघटना आंदोलन करणार असल्याची माहिती विधिज्ञ बाळासाहेब कावळे यांनी यावेळी बोलतांना दिली.
महाराष्ट्रात बहुतांशी ठिकाणी कांदा पीक असून या कांदा पिकाचा भाव सध्या चार ते पाच रुपये किलो दर झालेला असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कांदा बाजारात न आणता केवळ भावाची हालचाल पाहण्यासाठी शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात भावाची हालचाल पाहतांना दिसून येत आहे कांदा पिकाच्या या भावामुळे शेतकरी चांगलाच संकटात आलेला असून शेतकरी संघटना आता कांदा भावासाठी आंदोनल छेडण्याच्या तयारीत असल्याची माहिती यावेळी बोलतांना विधिज्ञ बाळासाहेब कावळे यांनी दिली.
……………………..//…………………..//……………….
एकीकडे ऊस ऊस उत्पादक शेतकऱ्याचे पेमेंट दोन – तीन महिन्यापासून रखडलेले असून दुसरीकडे सरकार खोटे आश्वासन देऊन शेतकऱ्याचा सातबारा कोरा करत नाही अशातच कांदा भाव चार ते पाच रुपये किलो दराने चालू आहे त्यामुळे शेतकरी चांगलाच हवालदिल झालेला आहे प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन त्वरित कांदा भाव वाढविण्यासाठी उपाययोजना करावी अन्यथा शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष विधिज्ञ अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा तालुका शेतकरी संघटना औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेवून शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती यावेळी बोलतांना विधिज्ञ बाळासाहेब कावळे यांनी दिली.




