*’ज्ञानोबा-तुकाराम’च्या अखंड गजरात ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पायी आषाढी पालखीचे नेवासातून भक्तिमय प्रस्थान*

*’ज्ञानोबा-तुकाराम’च्या अखंड गजरात ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पायी आषाढी पालखीचे नेवासातून भक्तिमय प्रस्थान*
श्रीक्षेत्र नेवासा | प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
संतभूमी श्रीक्षेत्र नेवासा आज पुन्हा एकदा वारकरी भक्तीच्या अविरत प्रवाहाने दुमदुमून गेली. बुधवार, दि. ८ जुलै २०२६ रोजी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पायी आषाढी पालखी सोहळ्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरातून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे अत्यंत भक्तिमय, मंगलमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात प्रस्थान झाले.
प्रस्थानापूर्वी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पवित्र पादुकांचे वैदिक मंत्रोच्चारात विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर टाळ-मृदंगाच्या निनादात, वीणेच्या सुरावटीत आणि **”ज्ञानोबा-तुकाराम”**च्या अखंड जयघोषात पालखीची पारंपरिक ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली. हजारो वारकरी, दिंड्या, महिला भाविक आणि नागरिकांनी या सोहळ्यात सहभागी होत भक्तिरसाचा अनोखा अनुभव घेतला.
ग्रामप्रदक्षिणेदरम्यान शहरातील विविध चौकांमध्ये नेवासकरांनी पालखीचे अत्यंत उत्स्फूर्त स्वागत केले. ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या, फुलांची उधळण, आतषबाजी तसेच संत-महंतांचा सन्मान करून माऊलींच्या चरणी आपली अखंड श्रद्धा अर्पण करण्यात आली. संपूर्ण नेवासा नगरी भक्ती, सेवा आणि वारकरी परंपरेच्या पवित्र रंगात न्हाऊन निघाल्याचे मनोहारी चित्र सर्वत्र पाहायला मिळाले.
यंदाच्या पालखी सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरला तो माऊलींच्या पादुकांचा भव्य रथ आणि नेवासा बसस्थानक परिसरात पार पडलेला पारंपरिक रिंगण सोहळा. या पवित्र सोहळ्याला हजारो वारकरी आणि भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रिंगणातील प्रत्येक क्षण भक्ती, श्रद्धा आणि वारकरी संप्रदायाच्या अखंड परंपरेचा साक्षीदार ठरला.
भक्ती, परंपरा आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम घडविणाऱ्या या पालखी सोहळ्यामुळे नेवासा नगरीत दिवसभर चैतन्याचे आणि भक्तीचे वातावरण अनुभवायला मिळाले. वारकऱ्यांचा उत्साह, नेवासकरांचा सेवाभाव आणि माऊलींच्या नामघोषाने यंदाचा ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पायी आषाढी पालखी सोहळा अत्यंत दिमाखात व अविस्मरणीय वातावरणात पार पडला.
दरम्यान, आजच्या दिवसाचा पालखी सोहळ्याचा मुक्काम श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय, नेवासा येथे होणार आहे. या मुक्कामानिमित्त नेवासकरांनी वारकरी संप्रदायाप्रती असलेली आपली श्रद्धा जपत घराघरातून भाकरी संकलन उपक्रम राबविला. संकलित भाकऱ्यांचा आज सायंकाळी वारकरी भाविकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादात समावेश करण्यात येणार असून, या सेवाकार्यात शहरातील नागरिकांनी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. नेवासा नगरीची ही सेवा परंपरा वारकरी संप्रदायातील “सेवा हीच खरी भक्ती” या मूल्याला पुन्हा एकदा अधोरेखित करणारी ठरली.




