*ग्रामीण भागातील गावोगावी सुसज्ज सभा मंडप उभारणीसाठी निधी मंजूर करा; आ. विठ्ठलराव लंघे यांची सभागृहात जोरदार मागणी*
*ग्रामीण भागातील गावोगावी सुसज्ज सभा मंडप उभारणीसाठी निधी मंजूर करा; आ. विठ्ठलराव लंघे यांची सभागृहात जोरदार मागणी*
नेवासा! प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
राज्याच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात नेवासा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी ग्रामीण भागातील विकासाशी निगडित महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत गावोगावी दर्जेदार व कायमस्वरूपी सभा मंडप उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सभागृहात केली.
यावेळी बोलताना आ. लंघे म्हणाले की, ग्रामीण भागातील अनेक गावे, मंदिर परिसर, यात्रा स्थळे, देवस्थाने, स्मशानभूमी तसेच विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी स्वतंत्र व सुसज्ज जागेचा अभाव आहे. त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या आर्थिक खर्चाचा सामना करावा लागतो. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन गावपातळीवर मजबूत व दीर्घकाळ टिकणाऱ्या सभा मंडपांच्या उभारणीसाठी विशेष योजना राबवावी.
ते पुढे म्हणाले की, ज्या ठिकाणी पूर्ण स्वरूपाचे सभागृह उभारणे शक्य नाही, त्या ठिकाणी इंजिनिअरिंग मानकांनुसार मजबूत स्टील स्ट्रक्चर व उच्च दर्जाच्या पत्र्यांपासून तयार करण्यात येणाऱ्या सभा मंडपांना परवानगी देण्यात यावी. अशा प्रकारचे मंडप कमी खर्चात, कमी कालावधीत आणि अधिक लोकाभिमुख पद्धतीने उभारणे शक्य असून त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे.
ग्रामीण भागात धार्मिक उत्सव, यात्रा, भजन, कीर्तन, ग्रामसभा, शासकीय कार्यक्रम तसेच विविध सामाजिक उपक्रम नियमितपणे आयोजित केले जातात. मात्र अनेक ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने कार्यक्रमांचे आयोजन अडचणीचे ठरत आहे. कायमस्वरूपी सभा मंडप उभारल्यास गावांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाला चालना मिळेल, असे मत आ. लंघे यांनी व्यक्त केले.
यासोबतच नियोजन विभागाने ग्रामीण भागासाठी स्वतंत्र मार्गदर्शक सूचना जारी करून स्थानिक स्वराज्य संस्थांना अशा सभा मंडपांच्या उभारणीसाठी मंजुरी देण्याचे अधिकार द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. यामुळे मंजूर निधीचा प्रभावी वापर होऊन ग्रामीण भागातील विकासाला गती मिळेल आणि जनतेच्या गरजांची पूर्तता होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
नेवासा तालुक्यातील गावोगावी सुसज्ज सभा मंडप उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा मुद्दा आ. विठ्ठलराव लंघे यांनी अधिवेशनात प्रभावीपणे मांडल्याने ग्रामीण भागातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संस्थांकडून त्यांच्या भूमिकेचे स्वागत होत आहे.



