*मंत्रालय परिसरात बेलापूर-परळी रेल्वे मार्गासाठी आंदोलन; उपोषणकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात*
मुंबई | प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा.
बेलापूर-परळी रेल्वे मार्गाला तातडीने मंजुरी मिळावी आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री व केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात यावी, या मागणीसाठी मंत्रालयासमोर सुरू करण्यात आलेल्या अमरण उपोषणास आज सकाळी सुरुवात होताच पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी त्यांना मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

उपोषणकर्त्यांमध्ये रितेश भंडारी, रज्जाक इनामदार, गोवर्धन म्हस्के, नितीन निकम आणि मन्सूर रसूल पटेल यांचा समावेश आहे. हे सर्व बेलापूर-परळी रेल्वे कृती समितीच्या वतीने आंदोलन करत होते.
कृती समितीने यापूर्वीच इशारा दिला होता की, पावसाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत बेलापूर-परळी रेल्वे मार्गाबाबत बैठक आयोजित न झाल्यास मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर कोणतीही पूर्वसूचना न देता अमरण उपोषण करण्यात येईल. त्यानुसार आज आंदोलनास सुरुवात करण्यात आली.
जून २०२२ पासून प्रस्ताव प्रलंबित
बेलापूर-परळी रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण होऊन त्याचा अहवाल जून २०२२ मध्ये केंद्रीय मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला. मात्र, या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाकडून तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गेली चार वर्षे रखडलेला आहे.
याच मागणीसाठी यावर्षी फेब्रुवारी महिन्यात कुकाणा येथे बेलापूर-परळी रेल्वे कृती समितीच्या वतीने तब्बल १३ दिवसांचे अमरण उपोषण करण्यात आले होते. त्या वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी मुख्यमंत्री व केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी बैठक आयोजित करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र, आंदोलनानंतर तीन महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही बैठकीचे नियोजन न झाल्याने कृती समितीने पुन्हा आक्रमक भूमिका घेत मंत्रालयासमोर आंदोलन छेडले आहे.
निवेदनाच्या प्रती वरिष्ठ नेत्यांना
या संदर्भातील निवेदनाच्या प्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तसेच या रेल्वे मार्गावरील सर्व खासदार आणि आमदार यांना पाठविण्यात आल्या आहेत.
बेलापूर-परळी रेल्वे मार्ग हा मराठवाडा, नगर आणि परिसरातील विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प मानला जात असून, या मार्गास लवकरात लवकर मंजुरी देण्याची मागणी कृती समितीने पुन्हा एकदा जोरदारपणे केली आहे




