वाढदिवसाचा जल्लोष; पण विकासाच्या प्रश्नांवर जनतेत नाराजी?
नेवासा | प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचा वाढदिवस आज तालुकाभर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत आहे. विविध ठिकाणी अभिष्टचिंतन सोहळे, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, सत्कार कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले आहे. मात्र या उत्सवी वातावरणात तालुक्यातील प्रलंबित विकासकामांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.
तालुक्यातील अनेक प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पावसाळ्यामुळे खड्ड्यांचे साम्राज्य वाढले असून नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पिण्याचे पाणी, गटारी, वीज, आरोग्य सुविधा, शासकीय कार्यालयांतील दिरंगाई आणि विविध विकासकामे रखडल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत.
नागरिकांमध्ये अशीही चर्चा आहे की, काही अधिकारी लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सूचनांकडे गांभीर्याने पाहत नाहीत. प्रशासकीय यंत्रणेची संथ गती आणि अधिकाऱ्यांची कथित मुजोरी यामुळे सामान्य माणसाला शासकीय कामांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांत तालुक्यात विविध गावांमध्ये वृक्षारोपण अभियान मोठ्या प्रमाणात राबविले जात आहे. हा निश्चितच स्वागतार्ह उपक्रम असला तरी त्याचबरोबर तालुक्याच्या विकासात भर घालणारे मोठे उद्योग, सिंचन, रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि रोजगारनिर्मितीशी संबंधित दीर्घकालीन प्रकल्प अपेक्षित वेगाने पुढे जात नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
दरम्यान, आमदार विठ्ठलराव लंघे यांनी पुनर्वसित गावांसाठी ५१ कोटी रुपयांच्या नागरी सुविधा विकासकामांना मंजुरी मिळाल्याची माहिती यापूर्वी दिली असून काही विकासकामे प्रक्रियेत असल्याचेही सांगितले आहे. मात्र या कामांची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि त्याचा लाभ नागरिकांपर्यंत किती वेगाने पोहोचतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत असताना, जनतेच्या अपेक्षा मात्र अधिक मोठ्या झाल्या आहेत. “उत्सवापेक्षा विकास महत्त्वाचा”, “घोषणांपेक्षा प्रत्यक्ष कामे दिसावीत”, “अधिकाऱ्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवून प्रलंबित प्रश्न सोडवावेत” अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे आगामी काळात तालुक्यातील विकासकामांना गती मिळते का, याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.




