अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान शासनाने तातडीने मदत करावी – अब्दुल शेख यांची मागणी

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान शासनाने तातडीने मदत करावी – अब्दुल शेख यांची मागणी
नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
नेवासा तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी उभे पीक, फळबागा तसेच साठवलेला शेतीमाल पूर्णपणे बाधित झाला आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी वर्ग गंभीर आर्थिक अडचणीत सापडला असून त्यांच्या समोर उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश संबंधित प्रशासनाला द्यावेत, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. यासोबतच मदत वाटप प्रक्रिया जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने राबवून प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचवावी, जेणेकरून शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यास मोठा दिलासा मिळेल.तातडीची मदत शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी राष्ट्रवादीचे युवा नेते अब्दुल शेख यांनी केली आहे




