डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार केंद्रस्थानी ठेवून कार्य केल्यास निश्चित प्रगती होईल” माजी मंत्री शंकरराव गडाख.

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार केंद्रस्थानी ठेवून कार्य केल्यास निश्चित प्रगती होईल” माजी मंत्री शंकरराव गडाख.
नेवासा प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार चिरंतन प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांचा अवलंब करून कार्य केल्यास निश्चित प्रगती साधता येते, असे प्रतिपादन माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी केले.
नेवासा शहरातील घटनापती प्रतिष्ठान तसेच नेवासा फाटा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित विविध कार्यक्रमांना भेट देऊन त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, डॉ. आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिल्यामुळे शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण झाले आणि समाजात मोठा सकारात्मक बदल घडून आला.
नेवासा तालुक्यातील गावागावांत तरुण पिढी एकत्र येऊन सामाजिक उपक्रम, रक्तदान शिबिरे आणि विविध जनहिताचे कार्यक्रम आयोजित करत असल्याचे त्यांनी कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे समाजात एकजूट निर्माण होत असून, ही बाब अत्यंत प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
तसेच, डॉ. आंबेडकर यांचे साहित्य हे नव्या पिढीसाठी अभ्यासाचे केंद्र असून त्यांच्या विचारांचे आचरण केल्यास समाज अधिक सक्षम आणि प्रगत होईल, असा विश्वासही गडाख यांनी व्यक्त केला.
यावेळी नेवासा शहर व नेवासा फाटा परिसरातील नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




