चिलेखनवाडी वीज उपकेंद्रावर परिसरातील शेतकऱ्यांचा मशाल मोर्चा.- भाऊसाहेब सावंत.
चिलेखनवाडी वीज उपकेंद्रावर परिसरातील शेतकऱ्यांचा मशाल मोर्चा.- भाऊसाहेब सावंत
नेवासा प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
चिलेखनवाडी वीजउपकेंद्रांतर्गत शेती फिडरवरून सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत अक्षयप्रकाश योजने अंतर्गत सिंगल फेज वीज पूर्ण दाबाने सोडण्यात यावी या मागणीसाठी गुरुवार दिनांक २० / ११/ २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता चिलेखनवाडी उपकेंद्रावर मशाल मोर्चा काढण्यात येईल असा इशारा सरपंच भाऊसाहेब सावंत यांनी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अहिल्यानगर यांना दिला आहे .
निवेदनात म्हटले आहे की चिलेखनवाडी येथील ३३ के . व्ही . वीजउपकेंद्रातून सिंगल फेज वीजपुरवठा अतिशय कमी दाबाने केला जात आहे . बल्प चालू असूनही प्रकाश पडत नाही कुठलेही उपकरणे चालत नाही . यावर उपाय म्हणून यापूर्वी शेती फिडरवरून पूर्ण दाबाने सिंगल फेज वीजपुरवठा केला जात होता परंतु १३ / ११ / २० २५पासून तो अचानक बंद केला आहे . सायंकाळी सहा वाजताच अंधार पडत असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासात , गृहिणींना स्वयंपाक करण्यात व्यत्यय येत आहे . त्याचप्रमाणे परिसरात बिबट्यांचा वावर असल्याने अनेक ठिकाणी बिबट्याने वस्त्यांवर हल्ले करून कुत्री , शेळ्या , वासरे यांचा फडशा पाडण्याच्या घटना घडल्या आहेत .त्यामुळे रात्री सर्वत्र अंधार असल्याने परिसरातील वाड्या वस्तीवरील शेतकरी भयभीत झाले आहेत नागरिकांची गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीने वीजवितरण कंपनीने त्वरित कार्यवाही करावी अन्यथा दिनांक २० /११ / २०२५ रोजी चिलेखनवाडी , कुकाणा , वडूले , अंतरवाली , भायगाव , पाथरवाला परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होतील . असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे . निवेदनावर अनेक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत .




