*२६ जूनपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘येलो अलर्ट’ नागरिकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन*
*२६ जूनपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘येलो अलर्ट’
नागरिकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन*
अहिल्यानगर, – : महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात २२ ते २६ जून २०२६ या कालावधीत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी केले आहे.
प्रशासनाने दिलेल्या सूचनांनुसार मेघगर्जना, वीज चमकणे किंवा वादळी वारे सुरू असताना झाडाखाली, मोकळ्या मैदानात अथवा उंच धातूच्या वस्तूंजवळ थांबू नये. विजेचे खांब, टॉवर्स, धातूचे कुंपण, रोहित्र तसेच लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्यांपासून सुरक्षित अंतर ठेवावे. विजेच्या उपकरणांचा वापर टाळावा.
शेतकऱ्यांनी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी काढणी केलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी आणलेल्या मालाचे संरक्षण करावे तसेच जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवावे, असेही प्रशासनाने सांगितले आहे.
धरण, नदी व कालवा परिसरात पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. पाण्याच्या प्रवाहात उतरू नये तसेच धोकादायक ठिकाणी सेल्फी किंवा छायाचित्रे काढण्याचे टाळावे.
कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. मदतीसाठी नजीकच्या पोलीस ठाणे किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय येथील ०२४१-२३२३८४४, ०२४१-२३५६९४० या क्रमांकांवर किंवा ११२ व १०७७ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



