*विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नका; शाळा-महाविद्यालयांच्या वाहनांची तातडीने तपासणी करा पत्रकार सोमनाथ कचरे यांची मागणी*
*विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नका; शाळा-महाविद्यालयांच्या वाहनांची तातडीने तपासणी करा
पत्रकार सोमनाथ कचरे यांची मागणी*
अहिल्यानगर प्रतिनिधी : महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
अहिल्यानगर जिल्ह्यातील खाजगी तसेच सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या बस, व्हॅन, रिक्षा आणि इतर वाहनांची संबंधित प्रशासनाने तातडीने विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी पत्रकार सोमनाथ कचरे यांनी केली आहे.
सध्या अनेक शालेय वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात असल्याचे दिसून येत आहे. काही वाहनांमध्ये सुरक्षेच्या मूलभूत सुविधांचा अभाव असून, वेगमर्यादेचे उल्लंघन, वाहनांची अपुरी देखभाल आणि वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे.
तपासणीमध्ये खालील बाबींवर भर देण्याची मागणी
शाळा बस व खाजगी वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र वैध आहे का याची तपासणी.
वाहन चालकांकडे वैध परवाना व आवश्यक अनुभव आहे का याची खात्री.
चालकांची वैद्यकीय तपासणी व चारित्र्य पडताळणी.
वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी तर नाहीत ना याची तपासणी.
प्रत्येक बसमध्ये अग्निशामक यंत्र, फर्स्ट एड बॉक्स व आपत्कालीन बाहेर पडण्याची सुविधा असणे.
बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे व जीपीएस यंत्रणा कार्यरत आहे का याची पाहणी.
वाहनांवर शाळेचे नाव, संपर्क क्रमांक व आवश्यक सूचना स्पष्टपणे नमूद करणे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित चढ-उतारासाठी सहाय्यक (अटेंडंट) नियुक्त करणे.
वेगमर्यादेचे काटेकोर पालन होत आहे का यावर लक्ष ठेवणे.
शाळा परिसर व गावांमध्ये धोकादायक वेगाने वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई.
नियमितपणे वाहतूक विभाग व प्रादेशिक परिवहन विभागाकडून संयुक्त तपासणी मोहीम राबविणे.
सोमनाथ कचरे यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. केवळ नियम बनवून चालणार नाही, तर त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. प्रशासनाने विशेष मोहीम राबवून शाळा व महाविद्यालयांच्या वाहनांची वेळोवेळी तपासणी करावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.”
पालक, शाळा प्रशासन आणि वाहतूक विभाग यांनी समन्वय साधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.



