*ऐतिहासिक मुक्ताई बारवचे आ. विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण*
*नेवासा तालुक्याच्या ऐतिहासिक वैभवात मानाचा तुरा; सेवावर्धिनी संस्थेच्या पुढाकारातून बारवाचे पुनरुज्जीवन*

*ऐतिहासिक मुक्ताई बारवचे आ. विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण*
*नेवासा तालुक्याच्या ऐतिहासिक वैभवात मानाचा तुरा; सेवावर्धिनी संस्थेच्या पुढाकारातून बारवाचे पुनरुज्जीवन*
नेवासा प्रतिनिधी :
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त नेवासा तालुक्यातील पिचडगाव येथील ऐतिहासिक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मुक्ताई बारव पुनरुज्जीवन व पुनर्वापर प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा बुधवार, १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
सेवावर्धिनी, पुणे तसेच ग्रामपंचायत व पिचडगाव ग्रामस्थांच्या पुढाकारातून या ऐतिहासिक बारवाचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे ऐतिहासिक वारसा जतन करण्याबरोबरच पुढील पिढीला आपल्या समृद्ध सांस्कृतिक व स्थापत्य वारशाची ओळख करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य झाले आहे.
यावेळी बोलताना आमदार विठ्ठलराव लंघे पाटील म्हणाले, “नेवासा तालुक्याच्या दृष्टीने हा ऐतिहासिक क्षण आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त या ऐतिहासिक बारवाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम सेवावर्धिनी संस्थेने हाती घेतले, ही अभिमानाची बाब आहे. या बारवाच्या कामाची सुरुवात वर्षभरापूर्वी माझ्या उपस्थितीत झाली होती. आज हे काम पूर्णत्वास आले असून त्याचे लोकार्पण होत आहे, याचा विशेष आनंद आहे.”
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी महाराष्ट्रासह देशभरात अनेक वास्तू, मंदिर, घाट व जलस्रोतांच्या निर्मिती व संवर्धनासाठी मोठे योगदान दिले. त्यांचा हा ऐतिहासिक वारसा जतन करण्याचे काम सेवावर्धिनी संस्थेने पुढे नेले आहे. नेवासा ही संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असून, या भूमीतील ऐतिहासिक ठेवा जतन होणे ही सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचेही आमदार लंघे पाटील यांनी नमूद केले.
बारव परिसराच्या पुढील सुशोभीकरणासाठी आमदार लंघे पाटील यांनी पुढाकार घेत प्लेविन ब्लॉक बसविण्यासह आवश्यक सुशोभीकरणाचे काम करून देण्याचे आश्वासन यावेळी दिले.
यावेळी सेवावर्धिनी संस्थेचे सचिव सोमदत्त पटवर्धन यांनी संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामाची माहिती दिली. संचालक डॉ. तेजस गर्गे यांनीही मनोगत व्यक्त करताना, “ही ऐतिहासिक वास्तू तिच्या मूळ स्वरूपात पुढील पिढीकडे सोपवता येत असल्याचा आनंद आहे. या कामासाठी सेवावर्धिनी संस्थेने घेतलेला पुढाकार महत्त्वपूर्ण आहे. पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाचे काम सुरू असून, या बारवाचे उर्वरित कामही अधिक उत्कृष्ट पद्धतीने कसे करता येईल, यासाठी प्रयत्न करण्यात येतील,” असे सांगितले.
पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या कामात सहभागी होण्याचे भाग्य लाभल्याचेही डॉ. गर्गे यांनी यावेळी सांगितले.
या लोकार्पण सोहळ्यास आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, डॉ. तेजस गर्गे, पुरातत्त्व विभागाचे मिलिंद वैद्य, सोमदत्त पटवर्धन, सुहास लुकड, उषाताई हजारे, डॉ. करणसिंह घुले, संजय लखवाल, भाऊसाहेब वाघ, अंकुश काळे, ज्ञानेश्वर पेचे, नानाजी जाधव, नितीन जगताप, सतीश मुळे, अशोक टेकने सर, ह.भ.प. माउली महाराज हजारे, शिवाजीराव शेजुळ, अशोकराव डांगे सर, चैताली ताई महाराज, आदिनाथ निकम, दिगंबर वाघोली, टील्लू गव्हाणे गुरुजी यांच्यासह पिचडगाव व परिसरातील तसेच नेवासा तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



