*”कसदार शिक्षणातूनच घडते उज्ज्वल भविष्य; शिक्षकांच्या समर्पणामुळेच ग्रामीण शाळा यशाच्या शिखरावर” – सोमनाथ कचरे*
*ग्रामीण शिक्षणाचा आदर्श ठरत असलेली काळेगाव शाळा; गुरु पौर्णिमेनिमित्त शिक्षकांचा गौरव, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान*

*”कसदार शिक्षणातूनच घडते उज्ज्वल भविष्य; शिक्षकांच्या समर्पणामुळेच ग्रामीण शाळा यशाच्या शिखरावर” – सोमनाथ कचरे*
ग्रामीण शिक्षणाचा आदर्श ठरत असलेली काळेगाव शाळा; गुरु पौर्णिमेनिमित्त शिक्षकांचा गौरव, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
शेवगाव /नेवासा प्रतिनिधी / महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काळेगाव ही ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आदर्श ठरत असून, आपल्या शैक्षणिक गुणवत्ता, संस्कार आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांमुळे यशाच्या शिखराकडे वेगाने वाटचाल करत आहे. गुरु पौर्णिमेनिमित्त आयोजित शिक्षक सन्मान व गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाला कुकाणा येथील माजी सरपंच तथा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ कचरे, कुलस्वामिनी उद्योग समूहाचे युवा उद्योजक सोमनाथ वाबळे आणि सामाजिक कार्यकर्ते असिफ सय्यद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना सोमनाथ कचरे म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे समर्पण, त्याग आणि सातत्यपूर्ण परिश्रम असतात. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा आज आपल्या गुणवत्तेच्या बळावर खासगी शाळांनाही स्पर्धा देत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त आणि गुणवत्तेची जपणूक करणारे शिक्षक हेच समाजाचे खरे शिल्पकार आहेत. अशा शिक्षकांच्या पाठीशी समाजाने ठामपणे उभे राहिले, तर विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी भरारी मिळेल आणि आदर्श समाज घडेल.”
पुनर्वसित व मोजक्या घरांची वस्ती असलेल्या काळेगावात तीन ते चार किलोमीटर अंतरावरून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात, हीच या शाळेच्या गुणवत्तेची आणि शिक्षकांवरील पालकांच्या विश्वासाची जिवंत साक्ष असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त करत आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. उपस्थित पालकांनी शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शहाराम आगळे, अशोक सौदागर, रामेश्वर शेकडे, संभाजी कडूस, आजिनाथ सौदागर, बाळासाहेब लांडे, तुकाराम शेकडे, भाऊराव सौदागर, नामदेव पालवे यांच्यासह ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण पिंगळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक संदीप आहेर यांनी मानले. गुरु-शिष्य परंपरेचा गौरव करणारा हा सोहळा प्रेरणादायी वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला.



