*बेलापूर–परळी रेल्वेसाठी उपोषण पेटणार; पोलिसांची आंदोलकांना नोटीस!*
*पालकमंत्री विखे पाटील यांच्या निवासस्थानासमोर आमरण उपोषण न करण्याचे निर्देश; आदेश न पाळल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा*

*बेलापूर–परळी रेल्वेसाठी उपोषण पेटणार; पोलिसांची आंदोलकांना नोटीस!*
*पालकमंत्री विखे पाटील यांच्या निवासस्थानासमोर आमरण उपोषण न करण्याचे निर्देश; आदेश न पाळल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा*
नेवासा | प्रतिनिधी-
बेलापूर–परळी रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी आता आंदोलनाला निर्णायक वळण मिळाले आहे. ९ ऑगस्टपासून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देणाऱ्या आंदोलकांना नेवासा पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यामुळे रेल्वे मार्गासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन विरुद्ध आंदोलक असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी बी.एन.एस.एस. कलम १७२ अन्वये संबंधित आंदोलकांना ही नोटीस दिली आहे. यापूर्वी बेलापूर–परळी रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनावेळी शासनाकडून देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे आता ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र, पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर उपोषण केल्यास सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची तसेच दखलपात्र अपराध अथवा मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी नोटीसमध्ये नमूद केले आहे.
त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी शासनाने ठरवून दिलेल्या ठिकाणीच आंदोलन करावे, कोणत्याही वैयक्तिक अथवा शासकीय निवासस्थानासमोर आमरण उपोषण करू नये, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांच्या निर्देशांचे पालन न केल्यास प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही नोटीसमधून देण्यात आला आहे.
या नोटिसा रितेश विजयकुमार भंडारी, संजय चंदनमल भंडारी, रज्जाक निजामशा इनामदार आणि नितीन विष्णुपंत निकम यांना देण्यात आल्या आहेत.
आता आंदोलन थांबणार की आणखी तीव्र होणार?
बेलापूर–परळी रेल्वेमार्गाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मागील आंदोलनांवेळी देण्यात आलेल्या आश्वासनांनंतरही प्रत्यक्ष कार्यवाही होत नसल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. त्यामुळे ९ ऑगस्टचे आमरण उपोषण रोखण्यात प्रशासनाला कितपत यश येते आणि आंदोलक पुढील भूमिका काय घेतात, याकडे संपूर्ण नेवासा तालुक्याचे लक्ष लागले आहे.



