*जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा भक्तिमय पायी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न*

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा भक्तिमय पायी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न*
खरवंडी, दि. १८ (वार्ताहर) : महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
‘जय जय रामकृष्ण हरी’ आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’ यांच्या अखंड जयघोषाने आज नेवासा तालुक्यातील विठ्ठलवाडी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विठ्ठलवाडी येथे शनिवार, दि. १८ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेला पारंपरिक पायी दिंडी सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
सकाळी ८ वाजता शाळेच्या प्रांगणात श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करून दिंडीचे प्रस्थान करण्यात आले. टाळ-मृदुंगाच्या गजरात, भगव्या पताका खांद्यावर घेतलेल्या आणि पारंपरिक वारकरी वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्या वारकऱ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थिनींनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन दिंडीत सहभाग नोंदवत वारकरी परंपरेचे सुंदर दर्शन घडविले.
दिंडीला गावातील भजनी मंडळ, ग्रामस्थ, पालक तसेच महिला-पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चिमुकल्या वारकऱ्यांच्या भक्तिभावाने आणि विठ्ठलनामाच्या गजराने संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता.
या दिंडी सोहळ्याचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक राऊत सर आणि शिक्षिका कदम मॅडम यांनी अत्यंत सुयोग्य पद्धतीने केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक, ग्रामस्थ आणि पालकांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी विष्णू शिरसाठ, मारुती तांदळे, राऊसाहेब तांदळे, रामराज्य ग्रुपचे विशाल कु-हे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. या भक्तिमय सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वारकरी परंपरा, संस्कार आणि सामाजिक ऐक्याची जपणूक करण्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचला.




