‘*रामकृष्ण हरी’च्या अखंड गजरात गळींब ते पंढरपूर पायी दिंडीचे उत्साहात प्रस्थान*

‘*रामकृष्ण हरी’च्या अखंड गजरात गळींब ते पंढरपूर पायी दिंडीचे उत्साहात प्रस्थान*
नेवासा (प्रतिनिधी ) : महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
आषाढी वारीचे भक्तिमय वातावरण सर्वत्र अनुभवास येत असताना नेवासा तालुक्यातील गळींब ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे रविवारी (दि. १३) सकाळी ९ वाजता टाळ-मृदंगाच्या निनादात, ‘रामकृष्ण हरी’ आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’ यांच्या अखंड जयघोषात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात प्रस्थान झाले. विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाची आस मनात बाळगून शेकडो वारकरी भक्तिभावाने पंढरीच्या वाटेवर मार्गस्थ झाले.
यंदाचा दिंडी सोहळा हरिभक्त परायण नामदेव महाराज शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला असून, दहा दिवसांच्या या प्रवासात वारकरी भक्तिमय वातावरणात नामस्मरण करत पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. दिंडीच्या संपूर्ण प्रवासात वाटचालीदरम्यान भजने, विसाव्याच्या ठिकाणी प्रवचने, सायंकाळी हरिपाठ, कीर्तन, भोजनानंतर भजन तसेच पहाटे काकडा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी दिंडी चालक तथा ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक जनार्दन शेळके यांनी सांगितले की, “गळींब गावातील सर्व ग्रामस्थांनी दिंडी सोहळ्यासाठी मनापासून सहकार्य व मदत केली. ग्रामस्थांच्या या योगदानामुळे दिंडी सोहळा अधिक भव्य आणि यशस्वी होतो. याबद्दल समस्त ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार.”
या प्रसंगी सुभाष शेळके (ग्रामसेवक भाऊसाहेब), जनार्दन शेळके, रामभाऊ शेळके, रावसाहेब खर्जुले, विठ्ठल अडसुरे, मधुकर कसबे, दत्तात्रय शेळके, दादासाहेब शेळके, रमेश शेळके, सूर्यभान शेळके (विणेकरी), गणेश पांडुरंग केने, भाऊसाहेब रामराव शेळके, प्रशांत कसबे यांच्यासह गळींब व परिसरातील महिला-पुरुष वारकरी, युवक, टाळकरी, विणेकरी आणि भजनी मंडळ मोठ्या संख्येने सहभागी झाले.
भक्तिरसाने ओतप्रोत भरलेला हा पायी दिंडी सोहळा विठ्ठल नामाचा अखंड गजर करत, संत परंपरेचा वारसा जपत आणि समाजात भक्ती, समता व बंधुभावाचा संदेश देत श्रीक्षेत्र पंढरपूरकडे मार्गक्रमण करीत आहे.




