*रामकृष्णहरी’च्या जयघोषात खामगाव (आगळे) नं. १ येथून पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान*

*रामकृष्णहरी’च्या जयघोषात खामगाव (आगळे) नं. १ येथून पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान*
नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
“रामकृष्णहरी… विठ्ठल विठ्ठल…” च्या अखंड जयघोषात आज खामगाव (आगळे) नं. १ येथील श्री तुळजा भवानी माता व हनुमान मंदिरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले.
यंदा या दिंडीत सुमारे २०० वारकरी सहभागी झाले असून, हा दिंडी सोहळ्याचा सलग चौथा वर्ष आहे. टाळ-मृदुंगाच्या गजरात, हरिनामाच्या अखंड घोषात आणि विठ्ठलनामाच्या भक्तिरसात वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाले.
दिंडी प्रस्थानापूर्वी मंदिरात श्रींची विधिवत पूजा, आरती आणि विठ्ठल-रखुमाईच्या नामस्मरणाने वातावरण भक्तिमय झाले. त्यानंतर उपस्थित भाविकांनी दिंडीतील वारकऱ्यांना शुभेच्छा देत निरोप दिला.
यावेळी नेवाशाचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या पत्नी रत्नमाला लंघे पाटील प्रमुख उपस्थित होत्या, तसेच तुळजा भवानी माता व हनुमान मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष व ज्ञानेश्वर कारखाना फळबाग सोसायटीचे अध्यक्ष – भाऊसाहेब आगळे, हे प्रमुख उपस्थित होते .
खामगाव (आगळे) नं. १ येथील ग्रामस्थ, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करून आणि “ज्ञानोबा-तुकाराम”, “रामकृष्णहरी”च्या जयघोषात दिंडीला उत्साहपूर्ण निरोप दिला.
विठ्ठलभक्ती, सामूहिक एकात्मता आणि वारकरी परंपरेचे दर्शन घडविणारा हा दिंडी सोहळा परिसरातील भाविकांसाठी श्रद्धा, संस्कार आणि भक्तीचा प्रेरणादायी उत्सव ठरला. यावेळी दिंडी प्रस्थानासाठी रामभाऊ आगळे, शिवाजीराव आगळे,राजेंद्र लकडे, सतिष आगळे, शेषराव आगळे, बाळासाहेब आगळे, भगवान भवर, दिलीपराव खोमणे, बद्रीनाथ आगळे, देवराव सरोदे, नागनाथ राव, भागिनाथ काळे आदी उपस्थित होते .




